एवढ्या जगात माय मानतो मराठी..!मराठी भाषेवर असणार्‍या प्रेमापोटी सर्व मराठी बांधवांच्या भेटीस हा नजराणा..!आपण समृद्ध होवूयात, भाषा समृद्ध करुयात..!



Blog Image

IMAGE COURTESY : Source

Source: Wordpress

भारताचा सम्राट' असा उल्लेख करण्यात आलेला मराठ्यांचा छत्रपती राजाराम महाराज

भारताचा सम्राट' असा उल्लेख करण्यात आलेला मराठ्यांचा छत्रपती राजाराम महाराज


छत्रपती शिवरायांनी दक्षिण दिग्विजय करण्यामागील जी काही कारणे होती,त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे दक्षिणेतील लहान मोठी राज्ये एकत्र करून दिल्लीवर आक्रमण करणे आणि औरंगजेबाचा पाडाव करणे.पण दुर्दैवाने छत्रपती शिवरायांचे हे स्वप्न त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकले नाही.पुढे संभाजी महाराजांनी मराठ्यांच्या राज्याची एक इंच जमीनही शत्रूस मिळू नये म्हणून अखेरपर्यंत लढा दिला.त्यांच्या मृत्यूनंतर राजाराम छत्रपतींनी तब्बल 11 वर्षे औरंगजेबाला झुलवत ठेवले.महाराष्ट्रापासून कोसो दूर असलेल्या जिंजीच्या किल्ल्यावर राहून राजाराम छत्रपतींनी केवळ महाराष्ट्र राखला नाही तर दिल्ली जिंकण्याचे फर्मानही आपल्या अनेक सरदारांना दिले होते.


राजाराम महाराजांचा रायगड ते जिंजी हा प्रवास खरेतर शिवरायांच्या आग्रा ते राजगड ह्या प्रवासापेक्षाही अत्यंत धोक्याचा होता.त्यातून सहीसलामत निसटून राजाराम महाराज नोव्हेंबर 1689 मध्ये जिंजीस पोहोचले.तिथून पुढे 9 वर्षे जे घडले ते मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत पराक्रमी पान. राजाराम महाराजांना या प्रवासात अनेक छोट्या मोठ्या हिंदू संस्थानिकांनी मदत केली.शिवरायांनी केलेल्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचे हे फलित.परंतू राजाराम महाराजांची मदत केल्यामुळे औरंगजेबाने आपल्या सैन्याचा मोर्चा या संस्थानिकांकडे वळवला.


वास्तविक,औरंगजेब हा त्याच्या उतारवयात कट्टर धर्मांध झाला होता.दक्षिणेतील बहुतांश नायक-पाळीगार हिंदू.मोगली सैन्याच्या आक्रमणामुळे तेथील हिंदू समाजाचे धर्म-संस्कृती,जीवन,वित्त या सर्वच बाबी धोक्यात आल्या होत्या.छोट्या मोठ्या संस्थानिकांच्या राज्यासही धोका उत्पन्न झाला होता.या सर्व पार्श्वभूमीवर,महाराष्ट्रातून एक मराठा राजा दक्षिणेत आला आहे,मोगली सैन्याशी लढा देतोय हे चित्र पाहून सर्व स्थानिक नायक-पाळीगारांनी राजाराम महाराजांच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेतला.खुद्द राजाराम छत्रपतींनी ह्या वातावरणाचा फायदा घेत दक्षिणेत औरंगजेबाविरुद्ध एक नवीन आघाडीचा उघडली.


या परिस्थितीचे वर्णन करताना मद्रासकर इंग्रज लिहीतात,

'औरंगजेबाच्या धर्मांध धोरणामुळे दक्षिणेतील सर्व हिंदू सरदारांनी राजारामाची, महान शिवाजीच्या दुसऱ्या मुलाची,बाजू घेणे पसंद केले.त्यांनी मोठ्या प्रमाणात उठाव केला आणि जाऊन राजारामास मिळाले,ज्याला ते भारताचा राजा,हिंदूंचा राजा समजतात.ह्या घटनेमुळे औरंगजेब,जो विजयाच्या प्रतीक्षेत आहे,त्यास मात्र मोठ्या प्रमाणात पराभव पाहायला लागेल हे निश्चीत.'


म्हणजेच,राजाराम महाराजांनी एवढ्या ताकदीने औरंगजेबाचा विरोध केला की सर्व दक्षिण भारतातील संस्थानिक महाराजांना येऊन मिळाले आणि महाराजांना 'भारताच्या सम्राटपदी' बसवण्याची स्वप्ने पाहू लागले.याच परिस्थितीचा फायदा घेऊन मराठ्यांनी औरंगजेबास इतके हैराण करून सोडले,की शेवटपर्यंत राजाराम छत्रपती हे अजिंक्यच राहीले.


©आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची


नर्मदेपासून ते मदुराईपर्यंत आपल्या तलवारीने पराक्रमाचा सह्याद्री उभा करणाऱ्या या उपेक्षित छत्रपतीस मुजरा..

Share on:

Comments





Recent Comment's

No comments available.


Related Blogs

×

Subscribe To Newsletter